रिक्षाच्या भाड्यावरुन वादातून झालेल्या हत्येचा उलगडा; आरोपीच्या तब्बल २४ वर्षानंतर उत्तर प्रदेशातील कानपूरमधून मुसक्या आवळल्या
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. फरार असलेल्या ५० वर्षीय आरोपी मामू उर्फ छोटे उर्फ बाबू ओमप्रकाश श्रीसाहुनी दिवाकर याला पोलिसांनी अखेर अटक केली. उत्तर प्रदेशातील कानपूरमधून पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाल यांनी ही माहिती दिली. १४ जानेवारी २००१ रोजी विरार परिसरात मोहर्रम अली मोहम्मद इब्राहिम अली (४६) याची धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी मामू आणि हारुन अली मुस्तकीन अली सय्यद यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. ऑटोरिक्शाच्या भाड्यावरून झालेला हा किरकोळ वाद होता. मृतक हा आरोपीच्या ऑटोरिक्शातून नियमित प्रवास करत असे, परंतु भाडे देत नसल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे ही खुनाची घटना घडली.
बल्लाल यांनी सांगितलं की, हारुन सय्यद याला सुरुवातीला अटक झाली होती. परंतु मामू पळून जाण्यात यशस्वी झाला आणि २४ वर्षे तो फरार होता. यंदा या प्रकरणाची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली. पोलिसांनी ऑटोरिक्शा चालकांचे जुने रेकॉर्ड आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदी तपासल्या. आरोपीच्या मुलगा आणि भाच्याच्या फोन नंबरांचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधला. अखेर, कानपूर येथील हामिदपूर रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ विशेष पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. २४ वर्षांनंतर आरोपीचा शोध घेणे सोपं नव्हतं, पण आम्ही कधीही हार मानली नाही,” असं बल्लाल म्हणाले. या अटकेमुळे दोन दशकांहून अधिक काळ थंडावलेल्या या प्रकरणाला नव्याने गती मिळाली आहे.