अबू आझमींचा मनसेवर जोरदार हल्लाबोल
मनसे कार्यकर्त्यांकडून टॅक्सी, रिक्षाचालकांना मारहाण, आजपर्यंत कुठलीही कठोर कारवाई नाही
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मिरा-भाईंदर शहरात सध्या मराठी भाषेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर, २ जुलै रोजी हजारो हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी त्या हिंसेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. या मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला. त्याच्या प्रत्युत्तरात, मनसेने मराठी भाषिक नागरिकांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर मनसेने मंगळवारी मीरा-भाईंदरमधील बालाजी हॉटेलपासून रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या. सोमवारी रात्री मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मोर्चाच्या ठिकाणी कार्यकर्ते जमल्यावर पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली होती. मात्र, काही वेळाने हा मोर्चा निघाला. आता या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मनसेवर जोरदार हल्लाबोल केलाय. अबू आझमी म्हणाले की, “मनसेच्या लोकांनी कायद्याची पायमल्ली केली आहे. त्यांना वाटते की, कोणतीही सरकार आले, तरी त्यांच्या विरोधात कारवाई होत नाही. याआधीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मारहाण केली होती आणि काही हत्या देखील झाल्या. पण, आजपर्यंत मनसेवर कुठलीही कठोर कारवाई झालेली नाही. अलीकडेच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मीरा रोडमध्ये एका दुकानदाराला मारहाण केली. पण, सुदैवाने तो दुकानदार ताकदवान होता. तो टॅक्सी किंवा रिक्षाचालक असता, तर एवढे लोक एकत्र आले नसते. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. मराठीचा अपमान कोण करत आहे, हे पाहायला हवे आणि जो अपमान करतोय, त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच अबू आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जो कोणी असेल, त्याच्यावर कायदा बळकटीने लागू केला गेला पाहिजे, अशी विनंती देखील केली आहे.