ठाणे जिल्ह्यात उद्धवसेनेला नवसंजीवनी मिळेल ?
भाजप पाठोपाठ आता ठाकरे गटानेसुद्धा भाकरी फिरवली; ठाकरे गटाकडून रोहिदास मुंडे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुखपदाची जवाबदारी
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्ष प्रवेशांची मालिका सुरू झाली आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपने ठाणे जिल्ह्यात भाकरी फिरवायला सुरवात केली आहे. कल्याण जिल्ह्याचे जुने अध्यक्ष हटवून त्यांच्या जागी नवीन नियुक्ती म्हणून नंदू परब यांची नियुक्ती केली आहे. यानंतर आता ठाकरे गट सक्रिय झाला असून भाजप पाठोपाठ आता ठाकरे गटाने सुद्धा भाकरी फिरवली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा असणाऱ्या रोहिदास मुंडे यांच्यावर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे.
दिव्यातील आक्रमक शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या रोहिदास मुंडे यांच्यावर मातोश्रीने विश्वास दाखवत कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. तशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला उभारी देण्याचे काम मुंडे यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा येथील शिवसैनिक व्यक्त करत आहेत. आगामी महापालिका निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी, शिवसेनेची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रमक चेहऱ्यांना संधी पक्षाकडून दिली जात आहे. रोहिदास मुंडे यांची आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळख असून विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्या मांडल्या..सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बुलंद आवाज असणारे रोहिदास मुंडे यांना विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्याने आगामी काळात कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज अधिक बुलंद होईल असा विश्वास स्थानिक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते विनायक राऊत, राजन विचारे, उपनेते आणि कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे व जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली मला जी जबाबदारी पक्षाने दिली आहे, ती पार पाडण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून प्रामाणिक प्रयत्न करेन. त्याचबरोबर महाराष्ट्र हितासाठी लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विचार कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे,असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.