आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार’, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
योगेश पांडे / वार्ताहर
वर्धा – वर्ध्याच्या सेवाग्राम येथील चरखा गृहात सोमवारी भाजपची महत्वाची विदर्भ स्तरीय आढावा बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या बैठकीला उपस्थित राहिले. सोबतच महसूल मंत्री, कामगार मंत्री, आदिवासी विकास मंत्री पालकमंत्री, सर्व आजी माजी आमदार खासदार व १९ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष सह ७५० पदाधिकारी या बैठकीला हजर होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी येणाऱ्या पाच वर्षात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकू, असा विश्वास व्यक्त केला. या विधानसभा निवडणुकीत आपण सर्व रेकॉर्ड मोडले. मी अत्यंत समाधानी आहे.१३७ जागा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलो. ३५ वर्षाच्या रेकॉर्डमध्ये इतक्या जागा कोणालाही जिंकता आल्या नाही, हा रेकॉर्ड आपण केला. यापूर्वी महाराष्ट्राचा रेकॉर्ड १२२ जागेचा होता तोही आपण तोडला. या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार आहोत. हे सरकार जेव्हा पाच वर्षे पूर्ण करेल तेव्हा महाराष्ट्राचे पूर्ण कायापालट झालेलं असेल,” असं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. “आपले विरोधक आपल्याशी विकासाची स्पर्धाच करू शकत नाही. ते रोज नवनवीन एकप्रकारे नेरेटिव्ह पसरवत असतात. ते विकासाची चर्चा च होऊ देत नाही. वरून इंजेक्शन मिळल्याबरोबर काही पोपट जनसुरक्षा कायद्याबाबत बोलू लागले आहेत. ज्यांना भारताचे संविधान मान्य नाही, अराजकता वादी विचारसरणी पोहचवायचे आहे.सर्वांना एकमेकांच्या विरोधात लढवायला लावायचं असे अर्बन नक्षल काम करत आहेत, म्हणून यांच्याविरोधात कार्यवाही करणे गरजेचे आहे,” असं ते म्हणाले. महाराष्ट्र हा माओवाद्यांचे सेंटर झाले आहे. त्यासाठी हा कायदा आणला. हा कायदा संस्थेवर बंदी घालण्याचा आहे. पण थेट कोणाला अटक करता येणार नाही. या विषयी आम्ही ओपन डिबेट करण्यास तयार आहे. निवडणुका जशा जवळ येतील तसतशी नवनवीन नरेटिव्ह येईल. विरोधकांकडून जाणीवपूर्वक हे वाद तयार केले आहेत,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपण ही निवडणूक महायुती म्हणूनच लढत आहोत. अर्थातच ज्याठिकाणी काही अडचणी आहेत तिथे आमच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यायचे आहेत. ज्याठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक होणार नाहीत त्याठिकाणी आपल्या मित्रपक्षावर टीका करायची नाही. कारण आपण जर सत्तेत एकत्र आहोत त्यामुळे आपल्याला मैत्रिपूर्ण लढती करायच्या आहेत. आपल्याला या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवायचे आहे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.