विरोधकांना मोठा धक्का; निवडणूक आयागोने मतदार यादीत घोळ असल्याचे आरोप फेटाळले
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यातील राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता. काही लोकांची नावे दोन मतदार संघात असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. तसेच काही मतदारांचे वय चुकीचे असल्याचाही आरोप विरोधकांनी केला होता. यावर आता राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. विरोधकांनी कांदिवली पूर्व मतदार संघात मतदारांचे वय अयोग्य दाखवण्यात आल्याचे विरोधकांनी म्हटले होते. दीपक कदम यांचे वय ११७ दाखवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर निवडणूक आयोगाने उत्तर देत कदम यांचे वय ११७ नव्हे तर ५४ वर्ष असल्याचे म्हटले आहे. तसेच इतर मतदारांची नोंदणीही कायदेशीर पद्धतीने झाल्याचे आयोगाने म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने हेही सांगितले की, नोंदणीची प्रक्रिया कायदेशीरच करण्यात आली आहे. मतदार नोंदणी, नाव वगळणं किंवा दुरुस्ती केवळ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांद्वारे केली जाते. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यात हस्तक्षेप करू शकत नाहीत. मतदार नोंदणीसाठी आयोगाचे सुरक्षित पोर्टल वापरण्यात येते. नवीन ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर पूर्वीच्या ठिकाणांची नावे वगळणे विहीत प्रक्रियेने होते. या प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे काही काळासाठी एकच नाव दोन ठिकाणी दिसू शकतं.
एक जुलै २०२५ पर्यंत अद्यावत केलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाला दिली असून ही हरकतींसाठी प्रसिद्ध केली आहे. १६ जुलै २०२५ रोजी च्या आदेशानुसार दुबार नावावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त बूथ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम सुरु आहे. पक्षाने बूथ एजंट नेमावेत असंही आयोगाने म्हटलं आहे.
नाशिकमध्ये एकाच घरात ८०० मतदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर आयोगाने म्हटले की, घर क्रमांक ३८९२ हे १५०० चौरस फुटाचे आहे. त्यात अनेक निवासी आणि अनिवासी बांधकामं असल्याने ८०० पेक्षा जास्त मतदारांची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाने विरोधकांचे आरोप फेटाळल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. मतदार यादी दुरूस्त करण्याची प्रक्रिया सुरु असताना विरोधकांनी बूथ एजंट नोंदवण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे. त्यामुळे आता विरोधक मतदार याद्यांच्या बाबतीत आगामी काळात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.