कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता
योगेश पांडे / वार्ताहर
नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील कथित मद्य घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या या निर्णयानंतर अरविंद केजरीवाल हे भावुक झाले आणि प्रसारमाध्यमांसमोर त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. “आमच्याविरोधात संपूर्ण खोटं प्रकरण तयार करण्यात आलं. आम आदमी पक्ष संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांना स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठं राजकीय षडयंत्र चरलं,” असा हल्लाबोल केजरीवाल यांनी केला.
अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. तुरुंगात काही काळ मुख्यमंत्रिपदाचा कारभार पाहिल्यानंतर त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. मात्र ज्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवढून निघालं होतं त्या मद्य घोटाळ्यात आता अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह अन्य आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
“आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. एका विद्यमान मुख्यमंत्र्यालाही तुरुंगात टाकलं गेलं. भारताच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं ते केलं गेलं. मला सहा महिने आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना जवळपास दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. हे सगळं प्रकरण निराधार होतं आणि आमची प्रतिमा खराब करण्यासाठी हा चिखल उडवणअयात आलं. मात्र आम्ही कट्टर इमानदार असल्याचं आता कोर्टाने सांगितलं आहे,” असं म्हणत अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.

