अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोठा घात; कट्टर विरोधक भाजप-काँग्रेसमध्ये युती – सत्ता स्थापन करणार
योगेश पांडे / वार्ताहर
अंबरनाथ – राज्यातीलच नाही तर देशाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजप आणि काँग्रेस चक्क नगरपरिषदेच निवडणुकीसाठी एकत्र आले आहे. सत्तेसाठी ऐकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू अचानक मित्र अंबरनाथमध्ये एकत्र आले आहेत.अंबरनाथ नगर परिषदेत शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप काँग्रेसची युती झाली असून शिवसेना शिंदे गटानं याला अभद्र युती म्हटले आहे. ही युती शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे. काँग्रेसच्या जोरावर भाजपा अंबरनाथ नगर परिषदेत बहुमतात येणार आहे.
काँग्रेसमुक्त देश करणार असल्याची घोषणा भाजप पक्षाने केली होती, मात्र आता भाजपा पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमतात येणार आहे.त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत.भाजपाच्या १६, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ असे एकूण ३२ नगरसेवकांची मोट बांधून भाजप बहुमत मिळवणार आहे. दरम्यान शिंदे गटाने ही तर अभद्र युती असल्याचा टोला भाजपाला लगावलाय. ही युती शिवसेना शिंदे गटाच्या जिव्हारी लागली आहे.
एकीकडे काँग्रेसमुक्त भारत करणाऱ्या भाजपाने काँग्रेसची हात मिळवणी करत शिवसेनेचा घात केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटले. तर दुसरीकडे गेल्या पंचवीस वर्षापासून भ्रष्टाचार केलेल्या शिंदे गटाला सोबत घेऊन जर सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती झाली असती असं भाजपा उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी म्हटलं. आम्ही अंबरनाथ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटासोबत महायुती संदर्भात अनेकदा बोलणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही असे देखील पाटील म्हणाले.
अंबरनाथ नगरपरिषदांच्या निवडणुकीची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. ही नगरपरिषद श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे याठिकाणी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले असले, तरी नगराध्यक्षपदावर भाजपने बाजी मारली आहे. अंबरनाथ हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी सुरुंग लावला आहे. अंबरनाथमध्ये जो गोळीबार झाला, त्यामुळे मतदान फिरले असल्याची चर्चा येथे रंगू लागली आहे.

