एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत बुधवारी कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन नगरसेविकांनी शिवसेनेते प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका शैलजा भोईर, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदी उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येकजण जपत होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हे पदाधिकारी काम करतात. आज वारकरी संप्रदायाचे देखील लोक शिवसेनेत सहभागी झाले”, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आज सखाराम पाटील, गजानन मांगरुळकर, संजय गायकर, धारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, गौरव ठाकूर, छाया काळे, वारकरी सांप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर, विश्वनाथ रसाळ, हेदुटणेचे सरपंच रामदास काळण, हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.
विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला. ८० जागा लढवून ६० जागा आम्ही जिंकलो. काहीजण म्हणत होते एकही जागा निवडून येणार नाही. पण आमचे ६० आमदार निवडून आले. ब्रँडचा बॅन्ड वाजवण्याचे काम जनता करत असते”, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. “ते जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब, मात्र बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक बॅलट पेपरवर झाली होती”, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. मागील अडीच वर्ष सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. महायुतीच्या काळात स्थगिती सरकारचे सगळे स्पीडब्रेकर काढून टाकले. त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात २३२ जागांचे ऐतिहासिक बहुमत दिले”, असे ते म्हणाले. “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल”, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. “अतिवृष्टीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मागील अडीच वर्षात शेतकऱ्यांना महायुती सरकारने ४५००० कोटींची मदत केली होती”, आताही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.