फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू- संजय शिरसाट
लोकांना महायुती हवीय; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा, रवींद्र चव्हाणांवर घणाघात
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण काही थांबण्याचे चिन्हे नाहीत. ३ नोव्हेंबरला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील फोडाफोडीवरून शिंदे नाराज असल्याची चर्चा असतानाच शिंदेंच्या निकटवर्तींयांनाच भाजपात घेतल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार पाडण्यात आले आहे. डोंबिवलीतील दोन बडे नेते भाजपाच्या गळाला लावण्यात रवींद्र चव्हाण यांना यश मिळाले आहे. सदानंद थरवळांचा मुलगा अभिजीत थरवळ तसेच कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंचे विश्वासू शिलेदार फोडताच मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत इशाराही दिला आहे.
रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. मग अॅक्शनला रिअॅक्शन होणारच.रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली-कल्याण कशाला बघता. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल, असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले. तसेच अशापद्धतीने फाटाफूट झाली तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा देखील मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे.
रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला धक्का दिल्यानंतर डोंबिवलीतील शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांकडूनही रवींद्र चव्हाणांवर टीका करण्यात आली. सांस्कृतिक नगरीत रवींद्र चव्हाण कुठल्या दिशेला चाललेले आहेत? त्यांची भूमिका योग्य नाही, इतक्या मोठ्या पदावर असून चार वेळा आमदार, एक वेळा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झालेत. तरी त्यांना स्वत:चे गड, शहर आणि मतदार संघ बांधता आले नाही. त्यांनी कोणत्या बेसवर भाजपा पक्षाने प्रदेशाध्यक्ष केले आहे?, असा सवाल देखील यावेळी शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला. तर शिवसेनेचे शंभर कार्यकर्ते फोडले त्यातून हजार कार्यकर्ते करण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसेना-भाजपची युती अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. हे रविंद्र चव्हाण यांनी लक्षात ठेवावे, असा टीका शिंदे गटाने रवींद्र चव्हाण यांच्यावर केली आहे.

