कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती १०० टक्के तुटणार – रविंद्र चव्हाण
भाजप आणि शिंदे गटात सुरु असलेल्या प्रचंड संघर्षात रवींद्र चव्हाण यांच्या सूचक वक्तव्यानं खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – राज्यभरात एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरुन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव निर्माण झाला असतानाच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना-भाजप युती हमखास तुटण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे संकेत दिले आहेत. ते डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत दिले.
रवींद्र चव्हाण यांनी थेटपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी फारकत घेऊन स्वतंत्रपणे लढू, असे सांगितले नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा एकूण सूर बरेच काही सांगून जाणार होता. त्यांनी म्हटले की, तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीत विश्वासाने मतदान करता. यावेळेस फक्त एवढीच विनंती आहे की, जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा. कामे मार्गी लावण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेत भाजपचे सरकार आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील. आपल्याला १०० टक्के एका विचाराचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे सरकार जे केंद्रात आणि राज्यात आहे तेच आणायचे आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. रवींद्र चव्हाण यांच्या महायुतीऐवजी कमळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांना निवडून द्या, या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांसह मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर देखील उपस्थित होते.
नगरसेवकाचे काम नगरसेवकांनी करावे ही भावना नेहमी राहिली. विकास निधी देणे माझे काम, परंतु बाकीचे काम नगरसेवकांनी करावे, हे अपेक्षित होते. काही नगरसेवकांकडून तसे काम झाले नाही. परंतु अडचणी काय होत्या हे आम्ही तुम्हाला सांगणे एवढे तुम्ही दूधखुळे नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
कल्याण डोंबिवलीतील मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते रवींद्र चव्हाण यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित होते. याबाबत बोलताना प्रकाश भोईर यांनी म्हटले की, आतापर्यंत मी जे काही निर्णय घेतले आहेत, ते कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतले आहेत. यापुढील निर्णयही त्यांच्याशी चर्चा करुन घेतले जातील, असे सूचक वक्तव्य प्रकाश भोईर यांनी केले.

