खासदार श्रीकांत शिंदे यांची अखेरच्या क्षणी डावपेच; अंबरनाथ नगर परिषदेत उपनगराध्यक्षपद राखले
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – अंबरनाथ नगर परिषदेत गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या राजकीय कुरघोड्यांचा शेवट झाला आहे. भाजपनं शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी अनेक डावपेच आखले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट काँग्रेसला सोबत घेत शिंदेसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. काँग्रस-भाजप युतीची बातमी देशभर गाजली. भाजपच्या कुरघोड्यांमुळे शिंदेसेना बॅकफूटवर गेली. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या अखेरच्या दिवशी डाव टाकत भाजपला चेकमेट केलं. अंबरनाथची नगर परिषद शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात येत असल्यानं इथल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या.
अंबरनाथच्या उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची निवड झाली आहे. पाटील यांना ३२ मतं मिळाली. त्यांनी भाजप प्रणित अंबरनाथ विकास आघाडीचे उमेदवार प्रदीप पाटील यांचा पराभव केला. प्रदीप पाटील यांना २८ मतं मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांना अखेरच्या टप्प्यात गेम फिरवत भाजपला जबर धक्का दिला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी शिंदेसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे शिंदेसेनेसमोर मोठी नामुष्की ओढवली. पण उपनगराध्यक्षपद आपल्याकडे राखण्यात शिंदेसेनेला यश आलं आहे.
शिंदेसेना आणि भाजपनं उपनगराध्यक्ष पदासाठी दिलेला शब्द हाच या निवडणुकीत अडचणीचा विषय ठरला. भाजपनं अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करत प्रदीप पाटील यांना उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली. तर दुसरीकडे शिंदेसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिव पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं. शिंदेसेनेकडे असलेल्या संख्याबळाच्या जोरावर सदाशिव पाटील यांनी बाजी मारली. ३२ मतं घेत ते ४ मतांनी विजयी झाली. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदेसेनेनं भाजपला शह दिला. या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे रविंद्र चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे श्रीकांत शिंदे अप्रत्यक्षपणे आमनेसामने आलेले दिसले.
अंबरनाथ नगर परिषदेत शिंदेसेनेनं सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. पण भाजपनं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. शिंदेसेनेपाठोपाठ भाजपचे १४ जण विजयी झाले. त्या खालोखाल काँग्रेसचे १२ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागांवर यश मिळालं. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी भाजपनं आधी काँग्रेसशी हातमिळवणी केली. ही युती राज्यात गाजली. त्यानंतर काँग्रेसनं आपल्या १२ नगरसेवकांना निलंबित केलं. भाजपनं या नगरसेवकांना आपल्याकडे घेतलं. त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. राष्ट्रावादीलाही सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. पण एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांना अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्या बाजूला घेत भाजपला धक्का दिला.

