‘दागिने सुरक्षित ठेवा’चा बहाणा; महिलेला ३.३० लाखांच्या दागिन्यांचा गंडा
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरात तीन महिलांच्या टोळीने चलाखीने फसवणूक करत एका महिलेचे सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी माने (वय ४२) या २७ मे रोजी कळवा येथील ज्ञानप्रसारणी शाळेजवळून जात असताना एका तरुणीने त्यांच्याकडे कळवा रेल्वे स्थानकाचा रस्ता विचारला. त्याचवेळी आणखी दोन महिला तेथे आल्या. त्यांनी परिसरात दागिने चोरीच्या घटना वाढल्याचे सांगत, अंगावरील दागिने सुरक्षिततेसाठी काढून रुमालात ठेवण्याचा सल्ला दिला.
महिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शुभांगी माने यांनी गळ्यातील मंगळसूत्र, बेलफुले आणि अंगठी काढून दिली. आरोपी महिलांनी दागिने पर्समध्ये सुरक्षित ठेवल्याचे भासवले. त्यानंतर त्या तेथून निघून गेल्या.
काही वेळाने कळवा स्टेशनजवळ पोहोचल्यानंतर शुभांगी माने यांनी पर्स तपासली असता त्यामधील दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ कळवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलांचा शोध सुरू केला असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

